कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागपुरात दोन दिवसांसाठी जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या जनता कर्फ्यूला शनिवारी नागपुरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. पण या दोन दिवसांच्या कर्फ्यू नंतर पुढे काय असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. या प्रश्नाचं उत्तर तुकाराम मुंढे यांनी दिलं आहे.
“नागरिकांनी दोन दिवस जसा प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद आणखी पुढचे काही दिवस दिला तर नागपुरात लॉकडाऊनची वेळ येणार नाही. पण नागरिकांकडून नियमांचं पालन केलं गेलं नाही, तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल”, अशी प्रतिक्रिया महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली आहे.
“दोन दिवस जनता कर्फ्यू झाला. आता नागपुरात प्रशासनाची कडक नजर राहील. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस आणि प्रशासनाकडून कारवाई केली जाईल”, असा इशारा तुकाराम मुंढे यांनी दिला. तसेच “उद्यापासून नियमांचं पालन करा, दिलेल्या वेळेत दुकान उघडा, गरज असेल तरच घराबाहेर पडा. मात्र नियमांचं पालन करा. बाजारात फक्त गरजेपुरताच जा”, असंदेखील आवाहन तुकाराम मुंढे यांनी नागपुरकरांना केलं.