पंतप्रधान मोदींचा लेह दौरा हा जवानांचे मनोधैर्य वाढवणारा होता. १९६२ च्या युद्धात चीनने केलेल्या पराभवानंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू आणि संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण हे LAC वर गेले होते, असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदींच्या लेह दौऱ्याला पाठिंबा दर्शविला आहे .
१९६२ मध्ये नेहरू आणि यशवंतराव चव्हाण यांनी LAC वर जाऊन जवानांचे मनोधैर्य वाढवले होते. सध्याच्या पंतप्रधानांनीही तेच केले. अशी तणावाची स्थिती निर्माण झाल्यावर देशाच्या नेतृत्वाने जवानांचा प्रोत्साहन देण्यासाठी अशी पावलं उचलली पाहिजेत, असं शरद पवार म्हणाले.
चीनच्या मुद्द्यावरून काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी तर पंतप्रधान मोदींना ‘Surender Modi’ असे संबोधले होते. यावेळी शरद पवार यांनी काँग्रेसपेक्षा वेगळी भूमिका मांडली होती. चीनसारख्या शेजारी देशासोबत तणावाची स्थिती असताना अशा मुद्द्यावर राजकारण करायला नकोय, असं शरद पवार म्हणाले होते.