वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे किंवा संपणार आहे अश्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात येणार असल्याने हे घटनाबाह्य असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. प्रशासक नेमायला आमचा विरोध असून निवडणूक घेता येत नसतील तर आहे त्या ग्रामपंचायतीलाच सहा महिन्याची मुदत वाढ देण्यात यावी, अशी मागणी ही प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांकडे केली.
आज सकाळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर व उपाध्यक्ष डॉक्टर अरुण सावंत यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
माध्यमांशी बोलताना आरक्षणाबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली. आरक्षणाबाबत राज्यपालांशी चर्चा झाली नाही. मात्र राजकीय आरक्षण हटवण्याची आपली भूमिका असल्याचं ते म्हणाले. “राजकीय आरक्षण दहा वर्षासाठी होते, ते वाढवू नये अशी आपली भूमिका आहे. राजकीय आरक्षण वाढवू नये ते संपवावं अशी आमची मागणी आहे”, असंही प्रकाश आंबेडकर यांनी अधोरेखित केलं.
“शिक्षण आणि नोकरीत दिलं जाणारं आरक्षण सर्वांना मिळावं यासाठी फॉर्म्युला तयार करण्याची मागणी त्यांनी केली. ज्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला नाही त्यांना आधी आरक्षणाचा लाभ मिळावा आणि ज्यांना यापूर्वी लाभ मिळालाय त्यांना नंतर आरक्षण मिळावं”, असं सूत्र प्रकाश आंबेडकर यांनी मांडलं.