उद्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र हा भूमिपूजनाचा सोहळ्यावर अनेक राजकीय नेत्यांकडून टीकास्त्र सोडले जात आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आता थेट राम मंदिरबाबत झालेल्या कोर्टाच्या निकालावर निशाणा साधला आहे.
अयोध्या राम मंदिराचा निकाल हा तथ्य किंवा पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला आहे. त्यामुळे जगभरात भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते”, असं वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. पुरावे आणि इतिहासाच्या दृष्टीकोनातून पाहिले तर अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. मात्र निकाल हा तथ्यांवर नसून भावनिकतेवर देण्यात आला, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
जगात भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाते. मात्र याबाबत कोणीही भारतीय स्वतःला विचारत नाही की आमच्यावर अत्याचार झालेले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करीत आहे. मात्र हे सत्य आहे की वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत आहेत. हे आता आयोध्येत होत आहे. हे सत्य आजही भारतीय मानायला तयार नाहीत. अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर होते. मात्र त्याबाबतचा निकाल हा तथ्यांवर नव्हे तर भावनांवर देण्यात आला, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.