लॉकडाऊन मान्य करू नका. राज्यातील सर्व दुकाने 1 तारखेपासून उघडा,’ असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडक यांनी दुकानदारांना केले आहे. त्याचवेळी ‘पाहिजे तर मला अटक करा. माझ्यावर गुन्हा दाखल करा, मी घाबरत नाही,’ असे म्हणत राज्य सरकारलाही आव्हान दिले आहे.
‘देशात आपल्या लोकसंख्येपैकी केवळ 5 टक्के लोक कोरोनामुळे बाधित होऊ शकतात आणि केंद्र आणि राज्य सरकार 95 टक्के लोकांवर अन्याय करीत आहेत. येत्या 1 तारखेपासून सर्वांनी आपापली सर्व दुकाने उघडून व्यवहार करावेत. बकरी ईद मुस्लीम बांधवांनी मोकळेपणाने साजरी करावी आणि रक्षाबंधनही व्यवस्थित मोकळेपणाने साजरे करावं,’ असं आवाहनही प्रकाश आंबेडकर यांनी औरंगाबादमध्ये बोलताना केले आहे.
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणाऱ्या अनेकांचा मोठे हाल होत आहे. याविरोधात आता विविध नेते भूमिका घेऊ लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही एका कार्यक्रमात बोलताना लॉकडाऊनमुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगत लॉकडाऊनविरोधात मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे राज्य सरकार लॉकडाऊनबाबत फेरविचार करणार का, हे पाहावे लागेल.