उद्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. पण हे राम मंदिर बांधण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २९ वर्षांपूर्वीच केला होता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 वर्षांपुर्वी अयोध्येला आले होते. त्याचवेळी त्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता. अशी माहिती ज्येष्ठ पत्रकार महेंद्र त्रिपाठी यांनी दिली आहे. महेंद्र त्रिपाठी यांच्याकडे त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येला भेट दिली तो फोटो देखील आहे.
ज्येष्ठ पत्रकार महेंद्र त्रिपाठी म्हणाले की, ’29 वर्षांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येला आले होते. त्यावेळी मी त्यांना प्रश्न विचारला होता की, आता अयोध्येला तुम्ही पुन्हा कधी भेट देणार आहात? त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, ‘राम मंदिर बनवल्या नंतरच मी अयोध्येला येईल आणि हा संकल्प आता प्रत्यक्षात उतरत आहे. याचा मी स्वतः पुरावा आहे. 1991 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत अयोध्येत आले होते. त्यावेळी त्यांना इतकं ओळखत देखील नव्हतं. परंतु ते त्यावेळी सतत मुरली मनोहर जोशी यांच्यासोबत दिसत होते
पत्रकार महेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा संकल्प केवळ काही लोकांना माहिती होता. हा संकल्प स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सांगितल्याचा दावा ते करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, ज्यावेळी 14 वर्षांचा वनवास संपवून राम अयोध्येत आले होते त्यावेळी अक्षरशः अयोध्येत दिवाळी साजरी करण्यात आली होती. आता देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 वर्षांनंतर अयोध्येत जात आहेत. त्यानिमित्ताने अयोध्येत दिवाळीसारखा जल्लोष करण्याची तयारी सुरु आहे.