पराग पोतदार: पुण्यासारख्या शहरात कोरोनारुग्णांची वाढती संख्या पाहता lockdown सारखे पाऊल नाईलाजाने उचलावे लागले असावे हे समजण्यासारखे आहे. परंतु यातून खरा उद्देश साध्य होणार का हा खरा प्रश्न आहे.
तीन महिन्यांच्या कडक लॉकडाऊननंतर आत्ता पुन्हा लावलेला (की लादलेला?) लॉकडाऊन आणि त्याचे एकूण स्वरूप पाहता खरोखर यातून कोरोनाचा फैलाव कमी होईल का या संबंधात साशंकताच जास्त वाटते.
मुळात एका मोठ्या लॉकडाऊननंतर लोक आर्थिकदृष्ट्या पार मेटाकुटीला आलेले आहेत. अनेकांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. मार्केट हालायला तयार नाही. आता आता लॉकडाऊन हा शब्दसुद्धा वापरू नका आणि पुनश्च हरिओम म्हणून सुरूवात करा सांगितल्याने लोकांनी पुन्हा एकदा उमेदीने व्यवसाय, रोजगार सुरू केले होते.
जरा कुठे अर्थकारणाची चक्रे फिरतील अशी आशा वाटू लागली असतानाच पुन्हा अचानक लॉकडाऊन झाले.
पुन्हा कडक लॉकडाऊन होणार या घोषणेमुळे आणि पहिल्या पाच दिवसांच्या कठोर नियमावलीमुळे लॉकडाऊनचा पहिला दिवस यशस्वी झाला परंतु, त्या भीतीपोटीच आदल्या दिवशी प्रचंड संख्येने बाहेर पडलेल्या लोकांनी आदल्या दिवशीच त्याचा फज्जा उडवून सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजवले!
अगदी रात्री ८-९ वाजेपर्यंत भाजी खरेदी, किराणा माल खरेदी यासाठी झुंबड उडालेली दिसत होती. पुढे पाच दिवस सगळे बंद म्हणून सगळ्या गोष्टी लोक घेऊन ठेवत होते. कात्रजच्या इथे नव्याने जो मासळीबाजार भरतो तो लॉकडाऊनच्या आदल्या दिवशी तुडुंब गर्दीने भरून वाहत होता. मार्केटयार्डातील भाजी खरेदीसाठी असलेली गर्दी आणि रांगा अगदी सिटीप्राईडच्या चौकापर्यंत आलेल्या होत्या. चिकन-मटणाची दुकाने तर रात्री उशीरापर्यंत सुरू होती आणि लोक तिथेही गर्दी करून खरेदी करताना दिसत होते. एरवी कोणत्याही कारणास्तव झाली नसती एवढी गर्दी केवळ उद्या लॉकडाऊन या भीतीमुळे झाली. हजारो लोक रस्त्यावर उतरून काही ना काही खरेदी करत फिरत होते. मग अशा परिस्थितीत कसलं सोशल डिस्टंन्सिंग आणि कसलं काय?
लॉकडाऊनच्या आदल्याच दिवशी इतक्या प्रचंड संख्येने माणसे रस्त्यावर आणून नक्की आपण काय साध्य केले? त्या दिवसभरात किती लोकांचा एकमेकांशी संपर्क आला असेल याची तर अक्षरश: गणनाच नाही.
मग जोरदार वातावरण निर्मितीनंतर अखेरीस लॉकडाऊन सुरू झाला. तसे लोक पुन्हा आपापल्या घरात बसले. गेले दोन तीन दिवस अगदी अत्यावश्यक कामांपलीकडे आणि दवाखान्यांमध्ये सोडली तर फारशी वर्दळ रस्त्यावर दिसत नव्हती. याचा तात्पुरता दिलासा वाटावा तोवर पुण्यात पुन्हा घोषणा केली की उद्या खास आखाडानिमित्ताने दिवसभर चिकन, मटण, मासे आणि किराणा माल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू राहणार..
म्हणजे पुन्हा पहिले पाढे पंचाव्वन्न!
तीच गर्दी, त्याच रांगा, तीच झुंबड, तोच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा…
अहो, मग अशा लॉकडाऊनमधून खरंच काय साध्य होणार आहे?
त्यापेक्षा लोकांना बदलत्या जीवनशैलीचा अंगीकार करू द्यावा आणि कोरोनासोबत जगायला शिकवावे हाच सध्याच्या परिस्थितीवरचा उतारा वाटतो. आपल्या यंत्रणांची शक्ती रस्त्यावर फिरणा-या लोकांना काठ्यांनी झोडपून काढण्यापेक्षा गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगबाबत जागरूकता निर्माण करण्यावर खर्च करावी. सामाजिक संस्था, तरुणांचे गट यांची यासाठी आवर्जून मदत घ्यावी. ते सारे यासाठी नक्की पुढाकार घेतील.
कोरोनाची आकडेवारी प्रचंड संख्येने वाढत असेल तर लॉकडाऊन आवश्यकही असेल कदाचित पण अशी गर्दी वाढवणारी लॉकडाऊन करण्यात खरंच काय हशील आहे?
यामागची तार्कीकता कुणाला समजत असेल तर खरंच समजावून सांगावी.
तूर्तास तरी आता उद्या दिवसभर आखाडानिमित्ताने जी गर्दी होणार त्याचे फोटो आणि व्हिडिओ आपण पाहायचे आणि नंतर पुन्हा एकदा ‘लॉकडाऊन’ नामक गोष्टीला सामोरे जात राहायचे.
असो…!
– पराग पोतदार, संपादक