अयोध्यामध्ये आज मोठ्या उत्साहात पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये राममंदिर भूमिपूजनचा कार्यक्रम पार पडणार आहे. यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राज ठाकरे म्हणाले की, जवळपास तीन दशकांचा संघर्ष, शेकडो करसेवकांचं बलिदान आणि दोन पिढ्यांमधील राजकीय कार्यकर्त्यांचा त्याग ज्या एका मूर्त स्वप्नासाठी होता, त्या स्वप्नपूर्तीचा क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आपल्या रामाचा वनवास संपला. उद्या राम मंदिराचं अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहे त्यातील हा एक क्षण आहे.
तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक करसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन, असे राज ठाकरे म्हणाले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची देखील आठवण काढली. ते म्हणाले की, ह्या क्षणी स्व. बाळासाहेब ठाकरे ह्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज ह्या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते, त्यांना मनापासून आनंद झाला असता.