मुंबई: मराठी भाषेच्या वापरावरून महाराष्ट्रात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. काही दिवसांपूर्वी मीरा-भाईंदरमध्ये एका अमराठी दुकानदाराला मराठी न बोलल्याच्या कारणावरून मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पक्षावर टीका झाली होती. या घटनेनंतर, वरळी डोम येथील मनसे शिवसेनेच्या विजयी मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी या प्रकरणावर भाष्य केले आणि कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या. राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत बजावले, “ऊठसूट मारायची गरज नाही. पण जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे.” हा इशारा मराठीच्या मुद्द्यावर अति-आक्रमक भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी होता.
हेही वाचा…शिंदेंच्या ‘जय गुजरात’ घोषणेवरून राऊतांचा टोला: “सत्तेसाठी आता मुजराही करतील!”
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
मारहाणीच्या व्हायरल झालेल्या घटनेचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी प्रश्न विचारला, “काल एका व्यापाऱ्याच्या कानफडात मारली. त्याच्या माथ्यावर गुजराती असं लिहिलं होतं का? इतर हिंदी आणि वेगळ्या चॅनलमध्ये चालवलं की गुजराती माणसाला मारलं. बाचाबाचीत समोरचा गुजराती निघाला. गुजरात्याला मारलं का? किती व्यापारी आहेत. अजून तर काहीच केलं नाही.” त्यांनी पुढे म्हटले, “त्यांना मराठी आली पाहिजे, यात वाद नाही. ऊठसूट मारायची गरज नाही. पण जास्ती नाटकं केली तर कानाखाली आवाज काढला पाहिजे. पण चूक त्यांची असली पाहिजे. अशी कधी गोष्ट कराल तर त्याचे व्हिडीओ काढू नका. आपल्या आपल्यातच त्यांना कळलं पाहिजे, कळलं का? मारणारा कधी सांगणारा नसतो, मार खाणारा सांगतो. मला मारलं. त्यांना सांगू देत. पण ऊठसूट कुणाला मारू नका.” राज ठाकरे यांनी यावेळी मराठी भाषेशी जोडल्या गेलेल्या अमराठी लोकांची उदाहरणेही दिली. “माझ्या परिचयाचे अनेक लोक आहेत. माझा मित्र आहे, नयन शाह. मी त्याला गुजराठी म्हणतो. तो अप्रतिम मराठी बोलतो. पण विनोदाचं अंग आहे. शिवाजी पार्कात हेडफोन लावून पु. ल. देशपांडे ऐकणारा गुजराती आहे. मराठीचं हे बाळकडू आमच्यासाठी बाळकडूच होतं,” असे सांगत त्यांनी भाषिक सौहार्दावर भर दिला.
हेही वाचा…ठाकरे बंधू अठरा वर्षांनी एकत्र: मराठी विजय मेळावा ठरणार ‘सुवर्ण क्षण’
‘सतर्क राहा सावध राहा,’
आपल्या भाषणाच्या समारोपात राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना भविष्यातील घडामोडींसाठी सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला. “यावर सावध राहा, सतर्क राहा. पुढे काही गोष्टी घडतील माहीत नाही. पण मराठीसाठीची एकजूट कायम राहावी. महाराष्ट्रात बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं ही अपेक्षा व्यक्त करतो,” असे म्हणत त्यांनी मराठी अस्मितेसाठी एकजुटीचे आवाहन केले. या भूमिकेमुळे मनसे कार्यकर्त्यांच्या आक्रमकतेला संयमित करून पक्षाची प्रतिमा अधिक सकारात्मक करण्याचा राज ठाकरे यांचा प्रयत्न असल्याचे दिसते.
दिशा सालियन प्रकरण पुन्हा तापले: राणे-ठाकरे गटात शाब्दिक युद्ध, राऊतांकडून माफीची मागणी!
मुंबईत ‘ठाकरे’ एकजुटीचा विजयी मेळावा: राऊतांचा शिंदे गटावर हल्लाबोल, ‘बूट चाटण्या’चा टोला!
पुण्यात अमित शाहंकडून बाजीराव पेशव्यांना मानवंदना: “एकही युद्ध न हरलेला एकमेव सेनापती!”