अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या कुकडीच्या पाण्यावरून राजकारणाने चांगलाच जोर धरला आहे. माजी जलसंधारण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर चांगलेच तोंडसुख घेत आहेत. आता त्यांना देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जशास तसे उत्तर दिले जात आहे. कुकडीच्या पाण्याचा कळवळा असल्याचा आव आणून राष्ट्रवादीवर टीका करणाऱ्या माजी पालकमंत्री राम शिंदे यांना भूतकाळाचा विसर पडला आहे. त्यांच्याकडे पाच वर्षे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असताना कुकडीचे पाणी मिळाले व आंदोलने झालीच नाही हा त्यांचा दावा स्वार्थीपणाचा आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तुम्ही उजवे हात होता. तेव्हा मंत्री पदाची ताकद वापरून बोगद्याचे काम का नाही करून घेतले असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी केला आहे. राम शिंदे सत्तेत असताना हवेत होते. त्यांचे पाय कधी जमिनीला टेकलेच नाहीत. त्यामुळे शिंदे मंत्री असतानाच्या काळात शेतकऱ्यांना किती हाल सोसावे लागले याचे कदाचितच त्यांना भान नसेल. सत्ता असताना शिंदे यांना सामान्य माणसे कधी दिसलेच नाही आणि त्यामुळेच रोहित पवार यांनी जनतेच्या मनात घर करत शिंदेंना जमिनीवर आणले आणि त्यांना धूळ चारली.
कर्जत-जामखेड मध्ये कुकडी चे पाणी नेण्यात शिंदे यांचे योगदान शून्य आहे. तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांनी मोठे प्रयत्न करत कर्जतला, तसेच दिगम्बर बागल यांनी कारमाळ्याला आणि आपण श्रीगोंद्यात हे पाणी आणले. त्यामुळे राम शिंदे यांनी कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत हुरळून जाऊ नये. पाच वर्ष आपण जिल्ह्याचे पालकमंत्री होता आणि देवेंद्रजींचे विश्वासू होता तरी देखील आपल्याला डिंभे ते माणिकडोह बोगदा करता आला नाही हे अत्यंत चुकीचे आहे. आता तुमच्या हातात काहीच राहिले नाही म्हणून राजकीय गप्पा मारणे बंद करा असा टोला देखील शेलार यांनी मारला आहे.
काय म्हणाले होते राम शिंदे
कुकडीच्या पाण्याच्या बाबतीत न्याय पाहिजे असेल तर पहिले राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना पक्षाचे सरकार हटवा आणि भारतीय जनता पक्षाचे सरकार सत्तेत आणा असा निर्वाळा देखील त्यांनी दिला होता. कुकडीच्या पाण्याच्या गोंधळावरून राम शिंदे म्हणाले की, पाणी व शेतीबाबत कळवळा दाखवनाऱ्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे प्रपंच उध्वस्त करून टाकले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मोठा हात आहे. कुकडीच्या डाव्या कालव्याचे उन्हाळ्यातील आवर्तन उशिरा पावसाळ्यात सोडून पारनेर, श्रीगोंदे, कर्जत, करमाळा तालुक्यांतील शेती उजाड करण्याचा यांचा डाव आहे असे देखील ते म्हणाले होते.