नागपूर : कायदा करण्याचा अधिकार संसदेला असून सर्वोच्च न्यायालयाने त्या कायद्याच्या चौकटीतच आपले निर्णय घ्यावेत, असे स्पष्ट मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे. नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या वक्फ बोर्ड संबंधित टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली. कायदे बनवण्याचा अधिकार संसदेचा असून, ती सर्वोच्च असल्याचे आठवले म्हणाले.
रामदास आठवले म्हणाले की, “वक्फ बोर्डासंदर्भात मुस्लिम समाजाच्या हितासाठी संसदेत कायदा करण्यात आला आहे. त्यावर न्यायालयाने चुकीच्या पद्धतीने टिप्पणी करणे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च असले तरी, संसदेच्या अधिकारावर आक्रमण करू नये. कायदे तयार करणारी संस्था संसद आहे आणि तीच सर्वोच्च मानली गेली पाहिजे.”
ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचे स्वागत :
ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, ही आमची इच्छा आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी या एकत्रीकरणाचे स्वागत केले. ते म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तरी महायुतीला कोणताही धोका नाही. उलट आम्हाला आनंदच होईल. मात्र, रिपब्लिकन पक्षाचे सर्व गट कधी एकत्र येणार हा आमच्यासाठी अजूनही प्रश्नच आहे.”
प्रकाश आंबेडकरांना देखील ऐक्यात सामील होण्याचे आवाहन करत आठवले म्हणाले की, रिपब्लिकन ऐक्य होणे ही जनतेची अपेक्षा आहे. त्यांनी पुढे मनसेच्या हिंदी विरोधी भूमिकेवरही भाष्य केले. “राज ठाकरे यांनी हिंदी भाषेविरोधात घेतलेली भूमिका योग्य नाही. मराठी भाषेबद्दल अभिमान असावा, पण प्रगतीसाठी हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचे महत्त्व आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी जर दादागिरी केली, तर त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.