हेरंब कुलकर्णी : मनोविकास प्रकाशनाने माझी ‘परीक्षेला पर्याय काय ?’ ‘आमच्या शिक्षणाचे काय?’ ‘जे कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स’ ‘शिक्षकांसाठी साने गुरुजी’ ही शैक्षणिक पुस्तके प्रसिद्ध केली. या पुस्तकांमधून मला शिक्षण क्षेत्रात मला थेट शिक्षक पालकांपर्यंत पोहोचता आले. मनोविकास चे वैशिष्ट्य हे की जेव्हा मी अगदी लेखनात नवखा होतो, तेव्हा ही पुस्तके प्रसिद्ध केली. अनेकदा सामाजिक अंगाने लिहिलेली पुस्तके फार विक्री होत नसल्याने स्वीकारली जात नाहीत परंतु ‘आमच्या शिक्षणाचे काय? सारखे वंचितांच्या शिक्षणावर चे पुस्तक प्रसिद्ध केले, माझ्या पुस्तकांचे विषय तसे अगदीच वेगळे आहेत. .
‘आमच्या शिक्षणाचे काय?’ हे पुस्तक मला सक्तीच्या शिक्षण कायद्यानंतर लिहावे लागले. 2010 ला सक्तीचा शिक्षण हक्क कायदा आला तेव्हा असे वाटले त्या सर्वांवर सक्ती होईल व एकही मूल शाळेबाहेर राहणार नाही. पण दोन वर्षातच हा कायदा प्रभावहीन झाला .शालाबाह्य मुले तशीच शाळेबाहेर राहिली आणि हे शालाबाह्य मुले ही दलित आदिवासी भटके यांचीच असतात. तेव्हा व्यवस्थेने ज्यांना शतकानुशतके शिक्षणापासून दूर ठेवले त्यांनाच आज आम्ही पुन्हा शिक्षणापासून वंचित ठेवतो आहे.
तेव्हा त्या अस्वस्थतेतून या पुस्तकाची कल्पना सुचली. शाळाबाह्य मुलांची संख्या सांगून शासनावर दडपण निर्माण होणार नाही तर प्रत्यक्ष त्या मुलांचे हाल व दुःख मांडली पाहिजेत असे वाटले. त्यातून मी 19 जिल्ह्यात फिरलो व त्या जिल्ह्यात जाऊन प्रत्यक्ष मुलांची स्थिती या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे प्रयत्न, शाळाभेटी, शिक्षकांच्या मुलाखती व शेवटी त्या विषयावर आलेले वेगवेगळे अहवाल आकडेवारी करून व उपाय अशा प्रकारे प्रत्येक प्रकारच्या शालाबाह्य मुलांचा प्रश्न यात मांडला.
बालकामगार, वेश्यांची मुले, उसतोडी कामगार, वीटभट्टी मजूर, दगडखाण कामगार, प्लॅटफॉर्मवरील मुले बालविवाह होणाऱ्या मुली, मुस्लीम मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न, शहरी झोपडपट्टीत असणाऱ्या मुलांच्या समस्या, आश्रम शाळा, भटक्या विमुक्तांच्या शिक्षणाचा प्रश्न इतका व्यापक परीघ त्या पुस्तकात आहे. त्यातून या वंचित मुलांविषयी संवेदना निर्माण व्हायला नक्कीच मदत झाली.या पुस्तकात गळतीचा प्रश्न मांडला आहे.
भारतात १०० विद्यार्थ्यात फक्त २६ विद्यार्थी उच्च शिक्षणात पोहोचतात. ही गळती होणारी मुले ही वंचित समूहांतील असतात. या गळतीचे कारण हे केवळ गरिबी नसून मुलांना लेखन वाचन क्षमता प्राप्त नसतात हे आहे हा मुद्दा मांडला आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षण हेच शालाबाह्य मुलांचा प्रशन सोडवायला दीर्घकालीन उत्तर आहे हे पुस्तकाचे मुख्य सूत्र आहे.
यानंतरचे ‘जे कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल्स’ हे पुस्तक अगदीच वेगळे आहे. कृष्णमुर्तीच्या प्रेरणेने भारतात व जगात अनेक शाळा स्थापन झाल्या.त्यांची पुस्तके शिक्षणावर आहेत परंतु मला नेहमी हे जाणवायचे की शिक्षक समुदायाला कृष्णमूर्तींविषयी माहिती नाही. असे का व्हावे ? तर डीएड,बीएड अभ्यासक्रमात शिक्षणतज्ञ म्हणून कृष्णमूर्तींचा कुठेच परिचय नाही व कृष्णमूर्तींनी सर्व इंग्रजीत लिहिल्याने ते फारशी पोहोचले नाहीत.
तेव्हा कृष्णमूर्तींची शिक्षणविषयक विचार व प्रत्यक्ष शाळाविषयीची माहिती असे एकत्रित पुस्तक लिहून शिक्षक समुदायाला कृष्णमूर्ती परिचित करून द्यावे असे वाटले. कृष्णमूर्तींची ८० पेक्षा जास्त पुस्तके मी वाचलेली. त्या सर्व पुस्तकांचा शिक्षणविषयक विचारांचे संकलन करून पुस्तकाचा पहिला भाग लिहिला व भारतातील राजघाट (उत्तर प्रदेश) द व्हॅली स्कूल(कर्नाटक) सह्याद्री स्कूल (महाराष्ट्र) ऋषी व्हॅली स्कूल (आंध्रप्रदेश) द स्कूल (तामिळनाडू) या ठिकाणी जाऊन भेटी दिल्या. प्रत्यक्ष त्या शाळांमध्ये किमान आठवडाभर राहिलो व शिक्षक समुदायाला जी उत्सुकता असते. ती विचारात घेऊन प्रत्यक्ष अध्यापनाचे काम कसे चालते याचे तपशील जमवले. त्यात त्या शाळांचे वेळापत्रक, अभ्यासक्रम, परीक्षा, चाचणी, स्नेहसंमेलन, शिक्षक विद्यार्थी संबंध क्रीडा,कला,संगीत यांचा समावेश होता.शिक्षक कसे निवडले जातात? शिक्षकांचे प्रशिक्षण? अशा अनेक मुद्द्यांची तपशीलवार माहिती गोळा करून पुस्तकात मांडली व शेवटी या शाळांकडून आपण काय घेऊ शकतो ? अशी उपाय योजना मांडली. त्यातून कृष्णमूर्तींचे तत्वज्ञान प्रत्यक्ष शाळांच्या अंमलबजावणी व आपल्यासाठी काय असे सर्वांनी पुस्तक होऊ शकले. या पुस्तकाला राज्य शासनाचा उत्कृष्ट साहित्य पुरस्कारही मिळाला.
शेवटी मी सानेगुरुजीपाशी येऊन थांबलो.महाराष्ट्रातील शेकडो शाळा बघितल्या. शिक्षणावर खूप लिहिले. खूप टीका केली. शासनाच्या समित्यांवर काम केले उपाययोजना सुचवल्या पण तरीसुद्धा शिक्षण क्षेत्र केवळ कायद्याच्या धाकाने बदलणार नाही असे वाटू लागले. शिक्षकांमधील स्वयंप्रेरणा जागी करणे हेच त्याचे उत्तर आहे. याच काळात मी अंमळनेरला गेलो तेथे साने गुरुजींची राहण्याची खोली बघितली माझे मन भरून आले आणि त्याक्षणी जाणवले साने गुरुजींना आपण गुरुजी म्हणतो परंतु त्यांनी शिक्षक म्हणून जे काम केले ते आपल्याला कुठे माहीत आहे ?
त्यानंतर गुरुजींविषयी वाचत गेलो. तेव्हा लक्षात आले की साने गुरुजींनी शिक्षक म्हणून जे काम केले, प्रयोग केले, विद्यार्थ्यांवर टोकाचे प्रेम केले त्याविषयी फारसे शिक्षक समुदायापर्यंत माहीत झाले नाही. तेव्हा फक्त सानेगुरुजींची शिक्षक ही प्रतिमा समोर ठेवून पुस्तक लिहावे व आपण गुरुजीं पासून काय प्रेरणा घेऊ शकतो अशी मांडणी करावी जेणेकरून शिक्षक समुदायात सानेगुरुजी ही प्रेरणा पुन्हा नव्याने जागी होईल असे वाटले.
मग त्यासाठी पुन्हा अमळनेर, साने गुरुजींचे जन्मस्थान पालगड. साने गुरुजी स्मारक माणगाव अशा ठिकाणी जाऊन आलो. सानेगुरुजीवर प्रसिद्ध झालेली सर्व ३५ पुस्तके मिळवून वाचली. गुरुजींच्या जिवंत असलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या.अनेकांशी बोललो व त्यातून शिक्षकांसाठी साने गुरुजी हे पुस्तक लिहिले व गुरुजींच्या व्यक्तीमत्वाची मांडणी करून पुस्तकाच्या उत्तरार्धात आपण गुरुजीं पासून शिक्षक म्हणून काय प्रेरणा घ्यावी ? साने गुरुजी सारखे आपण लोकशिक्षक कसे बनावे? गुरुजीं सारखे व्यासंगी कसे व्हावे? यासाठीचे अनेक पैलू मांडले. गुरुजींचे केवळ व्यक्ती म्हणून महात्म्य मांडण्यापेक्षा आजच्या परिस्थितीत गुरुजींच्या प्रेरणेने आपण कसे काम करू शकतो यावर जास्त भर दिला.
त्यातून या पुस्तकाने अनेक शिक्षकांना सानेगुरुजी विषयी माहिती झाली व प्रेरणा मिळाली असे अनेकांनी सांगितले. साने गुरुजी विद्यार्थ्यांना नवी माहिती मिळावी म्हणून रोज सकाळी आठ पानांचे भित्तीपत्रक लावायचे त्यासाठी आदल्या दिवशी एक तास वाचन व पहाटे चार ते सहा भित्तीपत्रक लेखन असे दोन वर्षे करत होते हा तपशील वाचल्यानंतर अनेक शिक्षक शहारले.असे समर्पण असणाऱ्या गुरुजींच्या महाराष्ट्रात आपण असे वेगळे काम करायला हवे अशी प्रेरणा जागृत झाली.
अशी पुस्तके नेमका काय परिणाम साधतात ? याचा मी नेहमी विचार करतो. तो परिणाम मूर्त स्वरुपात दिसत नाही पण शिक्षकांच्या व पालकांच्या जाणीव जागृतीला नक्कीच उपयोग होतो. राज्यात शालाबाह्य मुलांचे सर्वेक्षण शासनाने केले. त्यावर समाजात चर्चा झाली व त्या विषयावर तीव्र प्रतिक्रिया आल्या हा अप्रत्यक्ष परिणाम असतो.परीक्षा पद्धतीत बदल आता झाला पण या बदलाची मनोभूमिका किंवा पूर्वतयारी करण्याचे काम या पुस्तकाने केले. कृष्णमुर्ती शाळांविषयी उत्सुकता जागली आहे हे जाणवते.अनेकजण कृष्णमूर्ती आणि त्यांचे जगावेगळे विचार याविषयी खूप भरभरून बोलतात.आपल्या मराठी शिक्षण परिघात ते परिचित झालेत हे समाधान मोठे आहे.
साने गुरुजींचे हे रूप आम्हाला नवीन आहे. असे फोन तर येतात पण गुरुजींच्या स्मरणाने अनेकजण रडताना मी अनुभवले इतकी जादू साने गुरुजींची शिक्षक समुदायावर आहे. कृष्णमूर्ती आणि साने गुरुजी यांचा नव्याने परिचय मराठी वाचकांना मला करून देता आला याचे समाधान मोठे आहे. आज शिक्षक समुदायात जागृती वाढली आहे. शाळेत प्रयोग करावेत आणि आपली शाळा उपक्रमशील बनवावी अशी आकांक्षा असते.
अशा शिक्षकांना ही पुस्तके खूप जवळची वाटतात. असे शिक्षक श्रद्धेने वाचतात. साने गुरुजींनी अशा शिक्षकांना त्यांच्या अंतरात्म्याला साद घातली आहे. आजच्या काळात प्रशासन शिक्षकांना बदलायला असमर्थ ठरते आहे. समाजाचे दडपणही प्रभावहीन आहे अशावेळी असे महापुरुष प्रेरक दिपस्तंभ म्हणून शिक्षक समुदायाला बदलू शकतो हे यां पुस्तकांचे औचित्य आहे.
चारही पुस्तकांचे विषय नक्कीच वेगळे आहेत परंतु या पुस्तकांमधून शिक्षण विषयक शिक्षण विषयक प्रयोग शिक्षणातील प्रेरणा आणि वंचित मुलांच्या जगाविषयी शिक्षकांमध्ये जाणीव जागृती अशा व्यापक परिघावर मला लिहिता आले व शिक्षकांपर्यंत जाता आले. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जाताना किंवा व्याख्यानांच्या निमित्ताने फिरताना अनेक जण वाचलेल्या पुस्तकांची यादी सांगतात त्यात मनोविकासच्या या पुस्तकांची नावे असतात त्यातून या पुस्तकांनी आपली शिक्षणविषयक धडपड विचार अपेक्षा गावागावापर्यंत पोहोचली आहे हे लक्षात येते व मनोविकासविषयी कृतज्ञता वाटत राहते.
लेखक हेरंब कुलकर्णी हे शिक्षणतज्ञ असून त्यांनी आपल्या अनुभवांवरून मतं व्यक्त केली आहेत.
लेखकाचा संपर्क : 8208589195
Read Also ;
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा चेंडू सुप्रिया सुळेंनी ‘या’ नेत्याकडे टोलवलाhttps://t.co/d2wfisk5Z9 @EknathKhadseBJP @supriya_sule #rakshakhadse
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 16, 2020