अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यामध्ये सध्या कुकडीच्या पाण्यावरून राजकारणाने चांगलाच जोर धरला आहे. माजी जलसंधारण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर चांगलेच तोंडसुख घेत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि जिल्ह्यातील इतर काही राष्ट्रवादीच्या आमदारांवर राम शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी टीका केली होती. त्यावर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी तुमच्या काळात किती कामे झाली आणि तुम्ही काय काय केलं आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे असं म्हणत टीका केली होती.
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि श्रीगोंदा तालुक्यातील नेते घनश्याम शेलार यांची कुकडीच्या सल्लागार समितीवरून हकालपट्टी करावी अशी मागणी कुंभफेळ ग्रामपंचायतीचे सरपंच काकासाहेब धांडे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत कुकडी लाभक्षेत्रातील गावात वाडी वस्तीवर शेतकरी जनजागृती अभियान सुरु केले आहे. कर्जत तालुक्यातील कुकडीचे विविध प्रश्न सल्लागार समितीत मांडण्यासाठी व कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी त्यांचे प्रतिनिधी म्हणून घनश्याम शेलार यांची नियुक्ती केली होती. Remove Ghanshyam Shelar from the post of Kukdi Advisory Committee
घनश्याम शेलार यांनी कुकडीचे पाणी मिळवण्यासाठी काहीच प्रयत्न केलेले नाहीत. या जागेवर कर्जत तालुक्यातील महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याची निवड करावी असे देखील काकासाहेब धांडे यांनी म्हटले आहे. यावर्षी पावसाळा सुरु झाला तरी देखील कर्जतकरांना कुकडीचे पाणी मिळालेले नाही. यामुळे पिकांचे, फळबागांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. माजी मंत्री राम शिंदे यांच्या काळात कर्जत जामखेडकरांसाठी परिस्थिती चांगली होती. तेव्हा सगळ्यांना वेळेत पाणी मिळाले होते असे प्रतिपादनही धांडे यांनी केले आहे.