‘महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते श्री. फडणवीस हे सध्या राज्यभर दौरे करून कोरोना संकटाची माहिती करून घेत आहेत व कोरोनाशी लढताना सरकार कसे अपयशी ठरले आहे यावर रोज प्रवचने झोडत आहेत. त्यापेक्षा त्यांनी एकदा संपूर्ण धारावी पालथी घालून सरकारी यंत्रणेने केलेले यशस्वी काम पाहायला हवे.’, असा सल्ला फडणवीसांना सामनाच्या अग्रलेखामधून देण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे वारंवार ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखामधून टीकास्त्र डागण्यात आलं आहे.
‘कोरोना हे शंभर वर्षांतले सर्वात मोठे संकट आहे अशी नवी दुर्मिळ माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनीदेखील आता दिली. कोरोनामुळे उत्पादन, नोकऱ्या तसेच आरोग्यावर अभूतपूर्व असा नकारात्मक परिणाम पाहायला मिळाला आहे, असेही दास म्हणतात. या सगळ्या नकारात्मक परिणामांतून जनता सध्या जात आहे. त्यातून सुटका कशी होईल तेवढेच सांगा साहेब. आता प्रवचने नकोत!’, असं म्हणत मार्मिक टोलाही फडणवीसांना अग्रलेखातून लगावण्यात आला आहे.