राजस्थानमध्ये सत्ता टिकवण्यासाठी संघर्ष करणाऱ्या काँग्रेसनं मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान देणाऱ्या सचिन पायलट यांची उपमुख्यमंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्या तीन समर्थक आमदारांची मंत्रिपदंदेखील काढून घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदासह प्रदेशाध्यक्ष पदावरूनही सचिन पायलट यांना हटवण्यात आलं आहे.
दरम्यान, सध्याच्या या घडामोडींचा दाखला देत भाजपासोबत सत्तेत असलेले केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी ट्विटरवर व्हीडिओद्वारे एक नवा दावा केला आहे. रामदास आठवले ट्विटरद्वारे म्हणाले की, राजस्थानमध्ये सचिन पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत. मध्यप्रदेश नंतर राजस्थानमधील काँग्रेसची सत्ता जाऊन तेथे भाजपाची सत्ता स्थापन होईल. त्यानंतर महारष्ट्रात देखील सत्तांतर घडण्याची शक्यता आहे, असं रामदास आठवले यांनी सांगितले.
राजस्थान मध्ये सचिन पायलट यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत. मध्यप्रदेश नंतर राजस्थान मधील काँग्रेस ची सत्ता जाऊन तेथे भाजप ची सत्ता स्थापन होईल.त्यानंतर महारष्ट्रात सत्तांतर घडण्याची शक्यता आहे. @SachinPilot pic.twitter.com/8OiCl0eAiS
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) July 14, 2020
रामदास आठवले पुढे म्हणाले की, सचिन पायलट यांचा काँग्रेसमध्ये वारंवार अपमान होत होता. त्यामुळे त्यांच्या निर्णयाचं मी स्वागत करतो. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांना कधीच संधी दिली नाही. मध्यप्रदेशमध्येही ज्योतिरादित्य शिंदे यांच्याबाबतही हेच घडलं होतं. त्यानंतर मध्यप्रदेशातलं काँग्रेसचं सरकार गेलं. याचीच पुनरावृत्ती राजस्थानमध्ये होईल आणि तिथे सचिन पायलट यांच्या मदतीने भाजपाचं सरकार स्थापन होईल. सचिन पायलट यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामागे खंबीरपणे उभं राहावं, असं रामदास आठवले यांनी सांगितले.