सांगली जिल्ह्यात वाढत असलेल्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी २० जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीला विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना निमंत्रण मिळाले नव्हते
बैठकीत डावलल्याबद्दल विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी सांगलीचे पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याविरोधात हक्कभंगाची तक्रार केली आहे. तक्रारीचे पत्र त्यांनी विधान परिषदेच्या सभापतींकडे पाठवले आहे.
पत्रात म्हटले आहे की, ‘करोनासारख्या गंभीर संकटातही पालकमंत्र्यांनी राजकारण केले. जनतेचे महत्त्वाचे प्रश्न मांडण्यासह काही सूचना करण्याचा आम्हाला अधिकार आहे. विधान परिषदेच्या आमदारांबाबत दुजाभाव दाखवणे अयोग्य आहे. आमचा कायदेशीर हक्क डावलण्यात आल्याने पालकमंत्री जयंत पाटील आणि जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी.’