मराठा आरक्षणासंदर्भात काल सर्वोच्च न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत न्यायालयाने नवीन नोकर भरती न करण्यास सांगत, याचिकेवर पुढील सुनावणीसाठी 25 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर तारीख देण्यात आली आहे. आता यावर छत्रपती संभाजीराजे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठा आरक्षण हा काही राजकारणाचा मुद्दा नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट शेअर करत छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे. याबाबत सत्ताधारी पक्षाने किंवा विरोधी पक्षाने राजकारणाच्या पलीकडे जाऊन एकदिलाने काम करावं. सत्ताधारी पक्षाने मराठा समाजातील समन्वयकांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेत्यांनासुद्धा विश्वासात घेण्याची गरज आहे. आरक्षण हा काही राजकारणाचा विषय नाही.
ते पुढे म्हणाले की, मराठा समाजाने प्रचंड त्यागातून आत्तापर्यंतचा पल्ला गाठला आहे. याबाबत केंद्र शासनानेसुद्धा सहकार्य करणं गरजेचं आहे. मराठा आरक्षणासारख्या संवेदनशील विषयाची सुनावणी ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेऊ नये आणि हा मुद्दा ५ न्यायाधीशांच्या संवैधानिक पीठाकडे पाठवावा अशी समाजाची आणि माझी सुद्धा सुरुवाती पासून मागणी आहे.
शासनाने जोरदार मोर्चेबांधणी करणे आवश्यक आहे. पुढील सुनावणीवेळी समाजाची बाजू भक्कम पणे मांडली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.