भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी पुन्हा एकदा एक अजब वक्तव्य केले आहे. त्यांनी राज्यातील पुढलं राजकीय समीकरणाविषयी मोठे विधान केले आहे. पुढील निवडणुकीत राज्यात पवार-ठाकरे पॅटर्न येणार आहे, अशी राजकीय भविष्यवाणी संजय काकडे यांनी केली आहे. यावेळी या राजकीय घडामोडी आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल, असा दावा संजय काकडे यांनी केला आहे.
संजय काकडे म्हणाले, “महाविकास आघाडीने यापुढील निवडणुका एकत्र लढवल्या, तर ती आमच्यासाठी धोक्याची घंटा असेल. आगामी काळात पवार-ठाकरे पॅटर्न अस्तित्वात येणार आहे. मागील 3 महिन्यांपासून त्यासंदर्भात हालचाली सुरु आहेत. आगामी निवडणुकासंदर्भात महाविकास आघाडीचं जागावाटपही निश्चित झालं आहे.
“सरकार पाडायला हिम्मत नाही लागत, तो सगळा नंबर गेम असतो. आमचं सरकार जसं आमच्या कर्माने गेलं, तसं हे सरकार देखील त्यांच्या कर्माने जाणार आहे. आमचं सरकार होतं त्यावेळी शिवसेना खिश्यात राजीनामे घेऊन फिरायची. आता त्याचं काय झालं?” असा सवालही त्यांनी शिवसेनेला विचारला. तसेच आता आम्हाला सावध राहण्याची गरज आहे, असं मत व्यक्त केलं.
दरम्यान, संजय काकडे यांच्या या दाव्यावरून सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.