शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सामनाच्या रोखठोकमध्ये मुलाखत घेतली. यावर काही दिवसांपूर्वीच फडणवीस यांनी सामना हे आधी शिवसेनेचं मुखपत्र होतं आता ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचंही मुखपत्र झाल्याचं म्हटलं आहे. या टीकेवर संजय राऊत यांनी उत्तर दिलंय, सामना हे लोकांचं वृत्तपत्र आहे असं त्यांनी म्हटलं आहे.
एखाद्या नेत्याला ठरवून टार्गेट करणे हा सामनाचा अजेंडा कधीच नव्हता, आणि नसेल, असे संजय राऊत म्हणाले. “तुमचीही वृत्तपत्रे आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी. बघूया ते मुलाखत देतात का आणि ते ही मुलाखत छापण्याची हिंमत दाखवतात का?” असे आव्हानही राऊतांनी दिले.
तसेच ‘सामना’चा खप वाढविण्यासाठी शरद पवार यांची मुलाखत घेतल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. यावर उत्तर देताना, ‘सामना’ काय आहे, हे चंद्रकांत पाटील यांनी सांगावं अशी वेळ आलेली नाही, असा खरपूस समाचार राऊत यांनी घेतला.