जळगाव : राज्यात सत्ता बदलाच्या चर्चा अधूनमधून कानावर पडत असतात. मात्र, सध्या आगामी काळातल्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. शिवसेनेचे मात्तबर नेते खासदार संजय राऊत हे आज जळगाव दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देखील आगामी काळात शिवसेना जळगाव जिल्ह्यात सर्वच, अगदी लोकसभा निवडणूक देखील स्वबळावर लढेल, अशी घोषणा केली आहे.
जळगाव येथे आज पत्रकारांशी बोलताना त्यांनी, ‘स्वबळ म्हणजे काय हे मला माहिती नाही, मात्र जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे राजकीय बळ चांगले आहे. आमची निवडणुका लढण्याची मानसिकता आहे. त्यामुळे, येत्या काळात जळगाव जिल्ह्याच्या महापालिका, झेडपी, विधानसभा एवढेच नाही, तर लोकसभा निवडणूक देखील आम्ही स्वबळावर जिंकू. जिल्ह्यात शिवसेनेचा आधी आमदार, महापौर झाला, आता खासदार देखील शिवसेनेचा हवा, अशी अपेक्षा शिवसैनिकांची आहे, ती आपण नक्कीच पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचवू,’ अशी वल्गना त्यांनी केली आहे.
दरम्यान, जळगाव महापालिकेत नाट्यमयरित्या सत्तांतर झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला होता. शिवसेनेने भाजपचे २७ नगरसेवक फोडले आणि महापालिकेवर भगवा झेंडा फडकवला. याआधी जळगावमध्ये भाजपची सत्ता राहिली आहे. भाजपचे तब्बल ५७ नगरसेवक, तर शिवसेनेचे १५ नगरसेवक इथे होते. मात्र, भाजप नगरसेवकांनी बंड केले आणि ते शिवसेनेला जाऊन मिळाले आणि सत्तांतर घडून आले.
Read Also :
- पवारांनी कितीही रणनीती आखू द्या, २०२४ ला मोदीच येणार – फडणवीस
- आमचा विश्वास लोकशाहीवर, राहुल गांधीच बनणार पंतप्रधान – नाना पटोले
- आणखी एक मंत्री मंत्रिमंडळातून जाणार? अनिल परबांच्या अडचणीत वाढ
- चंद्रकांतदादाना काय झालंय माहित नाही; मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंची भूमिका योग्य
- ‘केंद्रात ‘राम’भरोसे, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार जाणार हे नक्की’