पारनेर नगरपालिकेतील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तणाव असल्याचं चर्चा रंगली होती. तसंच शिवसेनेचे नगरसेवक परत पाठवा असा निरोप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांना पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे.
“पारनेरमध्ये आमच्या काही नगरसेवकांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. याचा अर्थ अजित पवारांनी किंवा वरिष्ठ नेत्यांनी नगरसेवक फोडले असा होत नाही. त्यामुळे आता हा विषय आता चर्चेत येऊ नये, असं मला वाटतं,” असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले
मुख्यमंत्र्यांचं सर्व बारीक-सारीक गोष्टींकडे लक्ष आहे. मुंबई पोलिसातील बदल्यांचं कुणी राजकारण करु नये, त्यावरुन काही वाद नाही, असं संजय राऊत पत्रकार परिषद घेऊन म्हणाले. तसंच महाविकास आघाडी सरकारमध्ये कुरबुरी नाहीत. अंतर्विरोध, मतभेद हे शब्द महाविकासआघाडीत नाहीत. तसंच हे सरकार पाच वर्षे चालणार असल्याचा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं.
दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर नगरपंचायतीत शिवसेनेला धक्का बसला. पारनेरच्या शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला.