उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणा दिली होती. मात्र सभापती व्यंकया नायडू यांनी यावर आक्षेप घेतला होता. या प्रकरनम्नतर संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. त्या टीकेला उदयनराजे भोसले यांनी प्रत्युउतर देत व्यंकय्या नायडू यांचं काहीही चुकलेलं नाही असे सांगितले होते.
तसेच “संजय राऊत आमच्याकडे दाखले मागतात आणि आता ते आम्हाला विचारतायेत? संजय राऊतांना काहीही उत्तर देणार नाही” असे उत्तर उदयनराजे यांनी राऊत यांच्या टीकेला दिले.
तसेच बाळासाहेब ठाकरे आदरणीय होते, पण शिवाजी महाराज मोठे की बाळासाहेब हा माझा प्रश्न आहे? शिवसेना भवनावर बाळासाहेबांचा फोटो वर आहे, यावर आक्षेप का घेतला नाही?” असा प्रतिप्रश्न उदयनराजे यांनी केला. “बाळासाहेब मोठे वाटत असतील तर शिवसेनेने ठाकरे सेना नाव ठेवावं” असा टोलाही त्यांनी लगावला.
उदयनराजे यांच्या या भूमिकेवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “महाराजांच्या नावे कुणीही राजकारण करु नये, असं खासदार उदयनराजे भोसले बोलले. त्यांनी काही चुकीचं म्हटलं नाही”, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
“उदयनराजेंचा संवाद ऐकण्यात एक वेगळा आनंद आहे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. कोणीही छत्रपतींच्या नावाने राजकारण करु नये. तसेच उदयनराजे माझ्यावर टीका करतात. त्यांना लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे, ते टीका करु शकतात. ते म्हणाले मी महान आहे, माझं मत आहे की छत्रपती महान आहेत ,आम्ही त्यांचे मावळे आहोत, असं संजय राऊत यांनी नमूद केलं.
व्यंकय्या नायडू हे नियमानेच वागले, कायदे माहिती असणारा सभापती आहे, आम्ही सर्वजण त्यांचे ऐकतो, मात्र जय शिवाजी या आमच्या भावना आहेत, छत्रपतींनी महाराष्ट्राला महान केलंय, असं संजय राऊत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हा विषय नाही, विषय आहे जय शिवाजी, जय भवानीचा, त्यावरच बोलू, असं म्हणत, संजय राऊत यांनी शिवसेना भवनावरील बाळासाहेबांच्या फोटोचा प्रश्न टाळला.
जय शिवाजी, जय भवानी हा महाराष्ट्राचा मंत्र आहे, सीमेवरील जवानही हा जयघोष करतात, उद्या तुम्ही वंदे मातरम, जय हिंदला आक्षेप घ्याल, ते चालणार नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावलं.