करमाळा: करमाळ्याचे माजी आमदार नारायण आबा पाटील हे मुंबईत गेल्यावर शिवसेनेचे होतात तर सोलापुरात आल्यानंतर ते माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्व मानतात अशी टीका आमदार संजय मामा शिंदे काल यांनी केली होती. उजनीचे पाच टीएमसी पाणी इंदापूर तालुक्याला देत असताना माजी आमदार गप्प का बसले होते असा सवाल देखील संजय मामांनी केला होता. संजय मामा शिंदे यांची टीका नारायण पाटील यांना चांगलीच जिव्हारी लागली आहे. खुद्द मैदानात उतरून त्यांनी आता संजय मामा शिंदे यांचा समाचार घेतला आहे.
मोहिते पाटील घराण्याचे सोलापूर जिल्ह्यासाठी मोठे कार्यकर्तृत्व आहे. मोहिते पाटील घराण्याचा आदर करणे यात काहीही चुकीचे नाही. सोलापूर जिल्हातील बहुतांश नेते मंडळी ही मोहिते पाटलांच्या राजकीय तालमीतून घडलेली आहे. मोहितेंच्या नेतृत्वाखालीच सोलापूर जिल्हातील अनेक नेते मंडळी काम करत असते. एकेकाळी शिंदे बंधू यांनी देखील मोहिते पाटलांचे नेतृत्व स्वीकारले होते. या सर्वांचा आता आमदार संजय शिंदे यांना विसर पडला आहे. वास्तविकतः मी संघर्ष करून आणि जनतेची कामे करून आमदारकीपर्यंत पोहोचलो आहे असा टोला माजी आमदार आबा पाटील यांनी संजय शिंदे यांना मारला आहे.
आमदार संजय शिंदे यांना 2014 मध्ये पराभूत करुनच मी विधानसभेची निवडणूक जिंकली होती. हा इतिहास आमदार संजय शिंदे यांनी कधीच विसरू नये . तुमचा कट्टर विरोधी आणि माजी आमदार म्हणून आमदार संजय शिंदे यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार मला जनतेने दिला आहे. करमाळा विधानसभा मतदार संघातील विकासकामांबाबत मी नेहमीच विचारणा करत राहणार आहे आपण दोघांनी अपक्ष निवडणूक लढवलेली आहे. यामुळे अगोदर आपण कोणत्या पक्षाचे आहोत, हे आतातरी आमदार संजय शिंदे यांनी जनतेसमोर मांडावे, असे आव्हान माजी आमदार नारायण पाटील यांनी दिले आहे.
काय म्हणाले होते संजयमामा शिंदे
मुंबईत गेल्यावर माजी आमदार नारायण पाटील हे शिवसेना पक्षाचा आहे, म्हणून सांगतात. सोलापूर जिल्ह्यात परतल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे मोहिते – पाटील यांचे नेतृत्व मानतात. नारायण आबा पाटलांचा दुटप्पीपणा आता कारमाळ्यातील जनतेने पुरता ओळखला आहे. विजयसिंह मोहिते पाटील हे 2004 मध्ये उपमुख्यमंत्री असताना उजनी धरणातून मराठवाड्याला टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला. हा निर्णय होताना आमदार नारायण आबा पाटील गप्प का बसले होते ? असा सवाल आमदार संजय शिंदे यांनी उपस्थित केला.