राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार अमर, अकबर अँथनीचं सरकार आहे. ते पायात पाय घालून आपोआपच पडेल, असा टोमणा भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी लगावला होता. त्यावर आता काँग्रेसने पलटवार केला आहे. “देशात ‘अमर-अकबर-अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत असे भाजपला स्थापनेपासूनच वाटत आले आहे” असे उत्तर महाराष्ट्र युवा काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिले आहे.
“दानवे साहेब , भाजपाला स्थापनेपासूनच वाटत आले आहे की, या देशात ‘अमर अकबर अँथनी’ कधीच गुण्यागोविंदाने एकत्र राहू नयेत. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर यांनीसुद्धा ‘बंच ऑफ थॉट्स’ मध्ये हीच शिकवण दिली आहे, इतिहास साक्ष आहे. बाकी, महाराष्ट्र विकास आघाडीची चिंता नसावी !” असे ट्वीट सत्यजीत तांबे यांनी केले आहे.