सांगली जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरु आहे. या रस्ते कामासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. या महामार्गावर भोसे गावाच्या हद्दीतील यल्लम्मा मंदिराजवळ सुमारे 400 वर्षांपूर्वीचा वटवृक्ष उभा आहे. हे झाड तोडू नये यासाठी अनेकजण पुढे आले होते. आता या 400 वर्ष जुन्या वटवृक्षाविषयी तोडगा निघला आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत हा विषय गेल्यावर त्यांनी तात्काळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या संदर्भात पत्र पाठवले होते.
आता हायवेच्या सर्व्हिस रोडसाठी पर्याय काढून 400 वर्षे जुना वटवृक्ष वाचवण्याचा निर्णय महामार्ग प्राधिकरणाने घेतला आहे. महामार्गाची रचना थोडीशी बदलून बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) आणि दिलीप बिल्डकॉन या रस्ता बांधणी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
More than anything, I’m also extremely grateful to all those who brought this issue to notice and were persistent about saving it. A realigned Highway, a 400 heritage tree saved feels delightful
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 22, 2020
आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात ट्विट करत नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. आदित्य ठाकरेंनी ट्विट केली की, एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी सांगलीतील 400 वर्ष जुन्या वटवृक्षाची पाहणी केल्याचे समजले. त्यानंतर महामार्गावरील बायपास रस्त्याला पर्याय शोधण्याचा निर्णय झाला. त्यामुळे हे वृक्ष वाचले आहे. माझ्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मी आभार मानतो. ज्यांनी हा मुद्दा निदर्शनास आणला आणि हे वृक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचेही ही आभार मानतो.