कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व शिक्षण संस्था शाळा महाविद्यालय बंद आहेत. मात्र चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या चार ऑगस्टपासून गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
गडचिरोली, आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात गरीब लोक राहतात. नक्षलग्रस्त भागातील बहुतांश नागरिक दारिद्रय रेषेखालीलच आहेत. येथील मुले जिल्हा परिषदेच्या शाळेतच शिकतात. पालक मुलांना मोबाईल घेवून देऊ शकत नाही. तेथे ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही.त्यामुळे या शाळातील मुलांचे प्रचंड शैक्षणिक नुकसान होत आहे.
याच पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी काही नियमावली आणि निकष ठरविले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनात राज्यात सर्वप्रथम शैक्षणिक संस्था सुरू होण्याचा मान यानिमित्ताने या जिल्ह्यांना मिळणार आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यासह राज्यातील सर्व शाळा ३ ऑगस्टपासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे ओबीसी कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली होती. सध्याची स्थिती बघता ३ ऑगस्टपासून शाळा सुरु करण्याचा शासनाचा मानस आहे. त्यापूर्वी सर्व शाळा सॅनिटायझ करून घ्याव्यात, तसेच शाळांना मास्क,सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू तातडीने पुरवाव्यात,असे निर्देशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते.