कोकणात गणेशोत्सव सण मोठया प्रमाणावर साजरा केला जातो. त्यानिमित्ताने नोकरीसाठी पुणे – मुंबईत स्थायिक झालेले चाकरमनी मोठ्या संख्येयने आपल्या गावाला जात असतात. या वर्षीही चाकरमनी गावी जाणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने बाहेरून येणाऱ्या चाकरमान्यांसाठी विविध मार्गदर्शक सूचना जाहीर केली आहेत. जसे कि, ई पास काढणे, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट घेणे, व गावी आल्यावर क्वारंटाईन होणे अशा काही सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत
मात्र यावर नितेश राणे यांनी आक्षेप घेत या सर्व सुचना चाकरमान्यांसाठी त्रासदायक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची कोविड टेस्ट करुन 48 तासात कोकणात पाठवा, परप्रांतातील नागरिकांना सरकारने स्वखर्चाने पाठवलं, त्याप्रमाणे चाकरमान्यांचीही व्यवस्था करण्याची मागणी नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे.
गणशोत्सवात गावी येणारे चाकरमनी ज्या ठिकाणावरून निघणार त्या ठिकाणी त्यांची मोफत कोरोना स्वाब टेस्ट करून त्या आधारे रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास त्यांना प्रवास करण्यास आणि जिल्ह्याच्या सीमेवरील चेकपोस्टवर स्वाब टेस्ट दाखवून प्रवेश दिल्यास चाकरमान्यांच्या वेळेची बचत होणार आहे. कारण एकदा कोरोना टेस्ट झाल्यावर ४८ तासाच्या आत चाकरमान्यांनी जिल्ह्यात प्रवेश करणे गरजेचे आहे. त्या कालावधीत सादर व्यक्ती सुखरूप आपापल्या घरी पोहचू शकतात. निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्या व्यक्तींनाच जिल्ह्यात प्रवेश असल्याने क्वारंटाईनची गरज भासणार नाही. तसेच ई पासची गरज नसल्याने पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांवरील ताण देखील कमी होऊ शकतो. अशा काही मागण्या नितेश राणे यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना केल्या आहेत.
दरम्यान, गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना गावी जाण्याची परवानगी असल्याचे राज्याचे परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. गणपतीला चाकरमानी गावी जाणार असल्याने त्यासाठीचे नियोजन केले जात असल्याचेही परब यांनी स्पष्ट केले आहे. तसेच चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही, याची काळजी सरकार घेणार असून त्यादृष्टीने विषय चर्चिले गेले. या बैठकीचा तपशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देऊन त्यावर पुढील निर्णय होणार आहे, असे परब यांनी स्पष्ट केले.