महाराष्ट्रातील ठाणे, पुणे-पिंपरी, पनवेल, सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापुरात सोमवारपासून (20 जुलै) सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही घोषणा केली.
कोल्हापुरात येत्या सोमवारपासून म्हणजेच 20 जुलैपासून सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. यादरम्यान, सर्व नागरिकांनी या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. लॉकडाऊन दरम्यान कोल्हापुरात फक्त औषध आणि दूध पुरवठाच सुरु राहील, इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत.
“कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने थोडीशी चिंता वाढली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. परंतु, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणे गरजेचे आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम योग्य पद्धतीने आणि काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वजण प्रयत्न करुया, कोरोना संकटाचा मुकाबला करुया”, असं आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापुरकरांना केलं आहे.