मुंबईत नुकत्याच झालेल्या पोलीस दलाच्या बदल्यांवरुन महाविकास आघाडीत समन्वयाचा अभाव असल्याचं सर्वांसमोर उघड झालं. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या आदेशाखाली या बदल्या केल्या पण त्या काहीच दिवसांत रद्द करण्यात आल्या. त्यानंतर या बदल्या का रद्द केल्या? बदल्या करताना मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं नव्हतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.
पोलीस दलाचा या बदल्यांमुळे शिवसेना नाराज होती तसेच या बदल्या रद्द केल्या मुळे राष्ट्रवादी देखील नाराज झाली. त्यामुळे हि नाराजी दूर करण्यासाठी शरद पवार यांनी मध्यस्थी केली. शरद पवार आणि अनिल देशमुख यांनी काल मातोश्रीवर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. तब्बल एक तास चर्चा झाली आणि या बैठकीत एकमेकांबद्दल झालेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न झाल्याचं समजतंय.
शरद पवार यांनी या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना समोरासमोर बसवून गैरसमज दूर केले. मुंबईतल्या बदल्या रद्द केल्याने शिवसेना चांगलीच संतापली होती. गृहखातं राष्ट्रवादीकडे असताना मुंबईतले जे काही बदल असतील ते शिवसेनेला विश्वासात घेऊन करावे, असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं. तर पोलीस आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद झाला आहे असं वाटल्याने या बदल्यांना हिरवा कंदील दिल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. तसंच यापुढे कोणत्याही बदल्या करण्याआधी मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं जाईल अशी ग्वाही अनिल देशमुख यांनी दिली.
तसेच मुख्यमंत्र्यांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आपण चुकीचा संदेश बाहेर देत आहोत. महाविकास आघाडी म्हणून काम करताना असे पक्षप्रवेश करणं चुकीची असल्याचं सांगण्यात आलं. शिवसेनेचे नगरसेवक राष्ट्रवादीत घेताना शिवेसेनेशी संवाद का साधाला गेला नाही? असा सवाल शिवसेनेने विचारला.