शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची खास मुलाखत घेतली असून या मुलाखतीत मोदींची सत्ता उलथवून लावण्यासाठी कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर मी सगळ्यांशी बोलणार आहे, असा स्फोट शरद पवार यांनी केला.
देशातील विरोधी पक्षाला जाग आलीये असं दिसत नाही. तसंच विरोधी पक्ष विखुरलेला आहे. भविष्यामध्ये विरोधी पक्ष देशासमोर चांगलं काम करेल का? आपण त्यासाठी काही पुढाकार घेणार आहात का? असा प्रश्न राऊत यांनी पवारांना विचारला. त्यावर बोलताना पवार यांनी आपला भाजपचं सरकार घालवण्याचा इरादा व्यक्त केला तसंच या कामी मी स्वत: पुढाकार घेणार असल्याचं सांगितलं.
पवार म्हणाले, “कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि संसद एकदा का सुरू झाली की या कामाला गती येईल. देशांतल्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांमध्ये अशी एक भावना आहे की आपण एकत्र बसलं पाहिजे. आपण एकत्र बसून एक कार्यक्रम ठरवून देशवासियांसमोर एक पर्याय दिला पाहिजे. तो पर्याय देण्याची कुवत आजच्या विरोधी पक्षाच्या नेत्यामध्ये आणि त्यांच्या ऐक्यामध्ये निश्चितपणे आहे.”
“सगळे पक्ष कोरोनाकडे डायव्हर्ट झाल्याने ते काम आज थांबलं आहे. कोरोनाचे संकट येण्यापूर्वी देशांमधील विरोधी पक्षांचे लोक दोनदा एकत्र बसले. चर्चा केल्या. काही गोष्टींची धोरणे ठरवण्याच्या दृष्टीने विचार केला. आणि हे सगळं चित्र बदललं या रोगामुळे… पण माझी खात्री आहे की एकदा का संसद सुरू झाली की सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करणं याबद्दलची भूमिका घ्यावी लागेल”