राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष मुलाखत सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली. या मुलाखतीचा अखेरचा भाग आज प्रसिद्ध झाला. या भागात शरद पवार यांनी राजकीय विषयांवर प्रामुख्यानं भाष्य केलं.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन सहा महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी लोटला आहे. या काळात अधूनमधून सरकार अस्थिरतेच्या चर्चांचे पेव फुटले होते. त्याचबरोबर इतरही राज्यात सत्तांतर झाली. या राजकीय पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांना राज्यातील सरकारच्या भवितव्याविषयी प्रश्न उपस्थित केला. त्याला पवार यांनी उत्तर दिलं.
“ठाकरे सरकारचं भविष्य काय?”, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला. त्यावर “हे सरकार पाच वर्षे चालेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि अशी व्यवस्थित आम्ही काळजी घेतली तर पुढच्या निवडणुका सुद्धा एकत्र लढवू,” असं सुतोवाच शरद पवार यांनी यावेळी बोलताना दिले.