मागील काही दिवसांपासून राजस्थानमध्ये काँग्रेस नेते गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात सत्तेवरून संघर्ष सुरू आहे. यावरून आता शिवसेने भाजपवर निशाणा साधला आहे. सरकार अस्थिर करण्याचे राष्ट्रीय कार्य भाजप करत असल्याचे शिवसेने म्हटले आहे. सामनाच्या संपादकीयमधून शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे.
सामना संपादकीयमध्ये म्हटले आहे की, जोपर्यंत आमदारांची डोकी नीट मोजली जात नाहीत, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष उघडपणे पुढे येऊन काही करणार नाही. यासाठी भारतीय जनता पक्ष उघडपणे काहीच करीत नसून त्यांचे सरकार अस्थिर करण्याचे राष्ट्रीय कार्य पडद्यामागून चालले आहे.
देश कोरोना संकटाशी झुंजत असताना भारतीय जनता पक्षाने काही वेगळेच उपद्व्याप सुरू केले आहेत. या काळात भाजपने मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार पाडले. आता जिभेला लागलेले हे रक्त पचण्याआधीच राजस्थानातील गेहलोत सरकार पाडून ढेकर देण्याच्या स्थितीत भाजप दिसत आहे.
वाळवंटात राजकीय उपद्व्याप करून वादळ निर्माण करून भाजप काय साध्य करणार आहे? अशाने संसदीय लोकशाहीचे वाळवंट होईल. भाजपकडे देशाची संपूर्ण सत्ता आहे. काही घरे त्यांनी विरोधकांसाठी सोडायला हवीत. यातच लोकशाहीची शान आहे, असे सामना अग्रलेखात म्हटले आहे.