जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे हर्सुलचा तलाव पुर्णपणे भरला आहे. त्यामुळे शहरात पिण्याच्या पाण्यासाठी होणारी ओरड काहीसी कमी होण्यास मदत होणार आहे. शहराला पैठणच्या जायकवाडी धरणातून पाणी पुरवठा होत असला तरी जुन्या औरंगाबाद शहराला अजूनही हर्सुल तलावातून पाणी पुरवठा केला जातो. शहरासाठी हर्सुल तलावाचे महत्व लक्षात घेता जलपूजन करण्याचा कार्यक्रम आमदार अंबादास दानवे यांनी निश्चित केला होता.
त्यानूसार आज सकाळीच अंबादास दानवे आपल्या समर्थकांना घेऊन हर्सुल तलावावर पोहचले आणि त्यांनी जलपुजन केले. ते जलपूजन करून परत नाही तोच, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार प्रदीप जैस्वाल, माजी महापौर नंदकुमार घोडेले व इतर शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने हर्सुल तलावावर पोहचले. अंबादास दानवे जलपूजन करून गेल्याचे कळाल्यानंतर खैरे यांनी मग उत्तर पूजन करत मधला मार्ग काढला.
निसर्गाच्या कृपेने तुडुंब भरलेल्या हर्सुल तलावाच्या जलपूजनात देखील शिवसेनेच्या या दोन नेत्यांकडून कुरघोडीचे राजकारण झाल्याने याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून त्यांचा पक्ष व स्थानिक राजकारणातील प्रभाव कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात केली जाते. तर दुसरीकडे आपले अजूनही मातोश्रीवर पुर्वी इतकचे वजन असल्याचे खैरेंकडून वारंवार सांगितले जाते.
लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्यासोबतच अंबादास दानवे यांनी देखील पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. पण विजयातील सातत्य पाहता पाचव्यांदा उमेदवारीची माळ खैरे यांच्या गळ्यात येऊन पडली. त्यामुळे या दोघांमध्ये असलेला वाद उमेदवारीवर दावा सांगितल्यानंतर अधिकच वाढला. जिल्ह्यातील या दोन महत्वाच्या नेत्यांमधील वादात पदाधिकारी आणि शिवसैनिक मात्र नाहक भरडे गेले आणि जात आहेत.