भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा टाळीसाठी हात पुढे केला. “राज्याच्या हितासाठी आम्ही शिवसेनेसोबत येण्यास आजही तयार आहोत, पण जरी एकत्र यायची वेळ आली, तर निवडणुका एकत्र लढणार नाही” असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. बिहारच्या राजकारणाचा दाखला देत चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता बोलून दाखवली. आम्ही हात पुढे केला असा त्याचा अर्थ नाही, भविष्यातील या राजकीय शक्यता असल्याचे ते म्हणाले होते..
चंद्रकांत पाटील यांच्या या वाकव्यांनंतर शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तूनटीका करण्यात आली आहे. “भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात राहू नका. प्रयत्न करुन, जोरजबरदस्ती करुन, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो” अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून करण्यात आली आहे.
“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नड्डा यांना आडवे जाणारे बालिश वक्तव्य केले. राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले तरच राज्याचे हित, अन्यथा नाही. दुसरे असे की स्वतः फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दूषणे देत आहेत. मग शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार? पाटील यांनी एक मान्य केले पाहिजे की, राज्यात सध्या जी व्यवस्था सुरु आहे ती शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे व ती व्यवस्थाही राज्याच्याच हिताची आहे! भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात त्यांनी राहू नये” असा इशारा सामनाच्या अग्रलेखात दिला आहे.