नाशिक: सध्या राज्यात मराठा आरक्षणावरुन रान उठत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्ली येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. दिल्ली येथील भेटीनंतर मराठा आरक्षणावर चर्चा झाली असेल तर त्यांनी जाहीर करावं, असा सवाल शिवसंग्रामचे संघटनेचे नेते विनायक मेटे केला होता. राज्य सरकारकडून पंतप्रधान मोदींपर्यंत देखील हा विषय पोहोचवण्यात आला आहे. आता ह्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या कळीचा बनला आहे. एकीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती याबाबत आपली भूमिका मांडत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून वारंवार जुंपत आहे. राज्य सरकारकडून पंतप्रधान मोदींपर्यंत देखील हा विषय पोहोचवण्यात आला आहे. आता ह्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मराठा आरक्षण प्रश्नी काढण्यात येणारा मोर्चा हा दिल्लीत काढायला हवा. मराठा आरक्षणाबद्दल आम्ही पंतप्रधान मोदींकडे हात जोडून विनंती केली आहे. आता त्यावर पंतप्रधान निर्णय घेतील”,असे संजय राऊत म्हणाले. ते आज (१३ जून) नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलत होते.
मराठा आरक्षणाबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, “आम्ही पंतप्रधान मोदींना मराठा आरक्षणाबद्दल हात जोडून विनंती केली आहे. आता ते पुढील निर्णय घेतील. या प्रश्नी जर मोर्चा निघणार असेल तर तो दिल्लीत काढायला हवा. महाराष्ट्रातल्या वातावरणात गढूळपणा आणू नये”, असेही राऊत म्हणाले. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा समाज उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नुकतीच पंतप्रधान मोदींची भेट घेतली. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.