सारथी संस्थेच्या प्रश्नावर राज्य सरकारने आयोजित केलेल्या बैठकीत, छत्रपती संभाजीराजे भोसले तिसऱ्या रांगेत बसले होते. यांना व्यासपीठावर स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले. कार्यकर्त्यांनी संभाजीराजेंना तिसर्या रांगेत बसवल्याचा आक्षेप घेऊन कार्यकर्त्यांनी बैठकीत गोंधळ घातला. या बैठकीनंतर व्यासपीठावर न बसण्याबाबत स्वत: संभाजीराजेंनीच स्पष्टीकरण दिलं आहे.
‘मी इथे केवळ एक सदस्य म्हणून आलो आहे. त्यामुळे मान-अपमान महत्त्वाचा नाही. तर सारथी महत्त्वाची आहे,’ अशा शब्दांमध्ये संभाजीराजेंनी समन्वयकांची समजूत काढली. मी इथे समाज म्हणून उपस्थिती लावली आहे, मला सत्ताधारी समन्वयक आणि मंत्र्यांशी संवाद साधायचा आहे. त्यांच्याशी प्रश्नोत्तरे करायची आहेत. मी विचारपीठावर बसलो तर वेगळा संदेश बाहेर जाईल, म्हणून स्वच्छेनं सोशल डिस्टन्सिंग पाळत मी खाली बसलो होतो, असे स्पष्टीकरणच संभाजीराजेंनी दिले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या सारथी संस्थेसाठी 8 कोटी रुपयांची मदत जाहीर केली. तसंच “सारथी संस्था बंद होणार नाही. कुणीही अफवा पसरवू नका. मराठा समाजात गैरसमज पसरवू नका, सारथीचं काम पारदर्शी व्हावं” असं अजित पवार म्हणाले.