“राजस्थानातील फोन टॅपिंगने अनेकांचे पितळ उघडे झाले, पण काँगेस पुढाऱ्यांचे आपापसातील संभाषण कोणी चोरून ऐकले व ते राहुल गांधींपर्यंत पोहोचवले तरी बरेच गौप्यस्फोट होतील. राहुल गांधी यांना धड कामच करू द्यायचे नाही, असा विडाच काही लोकांनी उचलला आहे. याचा फटका समस्त विरोधी पक्षाला बसतो. फोन टॅपिंग हा गुन्हा व व्यक्तिगत स्वातंत्र्यावर आघात आहेच. लोकशाही मार्गाने सत्तेवर आलेले सरकार पैशांच्या बळावर पाडणे हा घटनाद्रोह आहे. त्यामुळे कोणता गुन्हा मोठा हे ठरवायला हवे,” असं शिवसेनेने सामना संपादकीयमध्ये म्हटलं आहे.
“राजस्थानमधील राजकीय युद्धाचे कवित्व अद्यापि संपलेले नाही. भारतीय जनता पक्षाबरोबर सचिन पायलट यांची जी सौदेबाजी सुरू होती ती पैशांच्या देवाणघेवाणीच्या टोकापर्यंत होती. म्हणजे राजस्थानचे गेहलोत सरकार हे पैसे चारून पाडायचे, घोडेबाजार करून बहुमत विकत घ्यायचे हे ठरले होते. सचिन पायलटांचे अन्यायाविरुद्ध बंड वगैरे प्रकरण झूठ होते याचा पर्दाफाश मुख्यमंत्री गेहलोत यांनी केला आणि त्यासाठी पायलट व भाजप नेत्यांमधील फोन संभाषण समोर आणले. ते धक्कादायक तितकेच खळबळजनक आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी केंद्रीय सत्तेचा दबाव व पैशांचा वापर झाला. तो काँगेसने उधळून लावला,” असं शिवसेनेने सांगितलं आहे.
“राजस्थानात राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी करणाऱ्यांनी अद्यापि त्यांच्या केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा का घेतला नाही? आधी गजेंद्र शेखावत यांचा राजीनामा घ्या, आमदार खरेदीच्या गुन्ह्याबद्दल प्रायश्चित्त घ्या व मग गेहलोत सरकारकडे बोट दाखवा. पायलट यांचे बंड फसल्याने भाजपचे कारस्थान उघड झाले. हे बंड फसफसले असते तर त्या आनंदोत्सवात सगळे गुन्हे पचवले गेले असते,” असं शिवसेनेने म्हटलं आहे.