खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मॅरेथॉन मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला अनेक राजकीय टोले लगावत हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हानही दिलं. यावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.
भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी त्याला ‘हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा’ हा फिल्मी डायलॉग असल्याचं प्रत्त्युत्तर दिलं.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “‘हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा’ हा फिल्मी डायलॉग आहे. त्यांचं हे विधान इतरांना उद्देशून नसून स्वतः उद्धव ठाकरे यांना उद्देशून आहे. ज्या दिवशी वाटेल त्यादिवशी ही हिंमत त्यांच्याच कामी येणार आहे. हे वाक्य म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या मनातील ‘द्वंद्व’ आहे. 30 वर्ष जुन्या मित्राला बाजूला सारत वैचारिक मेळ नसलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी घरोबा केल्याने ही हिंमत त्यांच्या कामात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी काँग्रेसला सतत कडवा विरोध केला आणि म्हणून त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे बसले असल्याने हे बळ त्यांच्याच कामी येवो अशा शुभेच्छा. सरकार बाहेरच्या कुठल्याही माणसांनी पडत नाही. मध्यप्रदेश आणि राजस्थान त्याची उदाहरणं आहेत.”