अहमदनगर: थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे, असा दावा भाजप खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केला आहे. सुजय विखे-पाटील फारसं राजकीय भाष्य करत नाहीत. मात्र रोहित पवारांच्या मतदार संघात त्यांना गुदगुल्या झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्यांदाच त्यांनी राजकीय भाष्य केल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडूनही राजकीय वर्तुळात यापूर्वीही अनेक भाकिते करण्यात आली आहेत.
या पार्श्वभूमीवर आता, भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी देखील याचप्रकारचे वक्तव्य करून पुन्हा एकदा या चर्चांना हवा दिली आहे. “एक मिनिट थांबा, दिवाळीनंतर आमचेच सरकार येईल!” असा दावा त्यांनी केला आहे. ते केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत मतदारसंघात आले होते. यावेळी, राज्य सरकारच्या योजनांबाबत त्यांच्याकडे अनेकांनी तक्रारी केल्या. यावरूनच त्यांनी महाविकास आघाडीला छेडले आहे. असा दावा त्यांनी केला त्यानंतर मात्र त्यांनी घुमजाव केलं. कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मी तसं विधान केलं, अशी सारवासारव त्यांनी केली आहे. यापुढेही असं बोलत राहू असही ते म्हणाले. तसेच त्यांनी सरकारी लसीकरण केंद्राचा आढावा घेतला आणि लसीकरणवेगवान करण्याची सूचना केली.
दरम्यान, कर्जत मतदारसंघात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. दुसरीकडे, कर्जत-जामखेड नगरपालिकांच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे, खासदार सुजय विखे पाटील आणि माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यात आढावा बैठका घेतल्या. यात त्यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला. त्यांनतर त्यांनी सरकारी लसीकरण केंद्रांचा आढावा घेतला आणि लसीकरण वेगवान करण्याची सूचना केली.