मुंबई : महाराष्ट्रात सध्या पंढरपूर पोटनिवडणूकीची जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघासाठीचे विधानसभा पोटनिवडणूकीचे मतदान १७ एप्रिल रोजी पार पडणार असून, त्याआधी राज्यातल्या प्रमुख प्रादेशिक पक्षांच्या नेत्यांनी, पंढरपुरात आपल्या प्रचारसभांनी निवडणुकीच्या मैदानात धुरळा उडवून दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अशा दिग्ग्ज नेत्यांच्या प्रचारसभांनातर, आज निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, या ब्रीच कँडी रुग्णालयातून (व्हर्चुअली) दूरदृश्य प्रणालीद्वारे, पंढरपुर-मंगळवेढा मतदारसंघात सभेसाठी हजर होत्या.
यावेळी आपल्या केलेल्या भाषणात त्यांनी, भालके नाना यांच्यासोबत आम्ही ठरवलं होतं की पंढरपूरचा चेहरामोहरा बदलला पाहिजे. पंढरपूर स्वच्छ, सुंदर आणि सुशोभीत कसं करता येईल याचा विचार आम्ही करत होतो. त्यामुळे पंढरपूर, भालके नाना आणि मी असं आमचं एक वेगळंच नातं होतं,’ असं म्हणत उपस्थितांच्या भावनांना हात घातला.
तसेच त्यांनी, ‘खूप विश्वासाच्या नात्याने भगीरथ भालके यांना ही जबाबदारी दिली आहे. नानांची अर्धवट राहिलेली स्वप्नं आणि आपल्या भागाचा सर्वांगीण विकास पूर्ण करण्यासाठी भगीरथ भालके यांना घड्याळाच्या बाजूचं बटण दाबून जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी,’ असं म्हणत त्यांनी आपल्या पक्षाचा उमेदवार विजयी व्हावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित केले.
त्याचसोबत राज्यात आजपासून लागू होणाऱ्या कडक निर्बंधाबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ‘आघाडी सरकार हे जनतेच्या बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. या महामारीच्या काळात परत लॉकडाऊन करतानाही समाजातील प्रत्येक आर्थिक दुर्बल घटकांना समान न्याय मिळेल, याची काळजी सरकारने घेतली आहे. त्यामुळे सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून आपण सरकारला सहकार्य करूया,’ असं आवाहन त्यांनी केलं आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर मतदारसंघातील रिक्त जागेवर पोट निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे, महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्यात थेट लढत होणार आहे. पंढरपूर पोट निवडणूक सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रतिष्ठेची केली आहे.