मुंबई : राज्यात गेल्या दोन महिन्यांपासून करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून, गेले सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधित रुग्णांच्या संख्येत उद्रेक होताना पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्यात इंजेक्शन, बेड, ऑक्सिजन, रुग्णवाहिका अशा आरोग्य सुविधांची वानवा जाणवत असून, राज्यातील ही परिस्थिती लक्षात घेऊन काल, मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यावेळेस मुख्यमंत्र्यांनी, संसर्ग थांबवायचा असेल तर लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही, मात्र ते करताना कष्टकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही दिली. जवळपास अडीच तास सुरु असलेल्या या बैठकीत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून देखील अनेक सूचना करण्यात आल्या.
यावेळी अचानक लॉकडाऊन जाहीर करण्याऐवजी लोकांना विश्वासात घ्या, लॉकडाऊनचा रोड मॅप लोकांसमोर मांडा आणि मगच निर्णय घ्या, असा आग्रह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत धरला.
तसेच, याला लॉकडाऊन म्हणा की आणखी काही, पण करोनाने जे अनर्थचक्र राज्यावर ओढवले आहे. त्याला रोखायचे असेल, तर राज्यात काही काळासाठी कडक निर्बंध लावावेच लागतील, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे राज्यात उद्यापासून ८ किंवा १५ दिवसांचा कडक लॉकडाऊन होण्याची तीव्र शक्यता आहे.