”माजी उच्च शिक्षणमंत्री तावडे यांनी सरकारला सूचना जरूर कराव्यात; पण टीका करताना भान राखावे. ते माझ्या कारभारावर टीका करतात. त्यांनी मात्र ६० शासन निर्णय जाहीर केले आणि ते सर्वच मागे घेतले. मी माझ्या शासन निर्णयावर ठाम असतो,” असे सांगत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. विद्यापीठाच्या अंतीम वर्षाच्या परीक्षांवरुन सध्या सरकार व विरोधकांमध्ये वाद सुरु आहेत. त्या पार्श्वभूमीवर सामंत यांनी ही टीका केली आहे.
ते म्हणाले, “परीक्षेविना पदवी म्हणजे ‘कोविड १९’ ची पदवी, असा आरोप विरोधक करत आहेत. राजकारण करण्यासाठी निवडणुका आहेत. सभागृहातही ती संधी आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘कोविड १९ पदवीधर’ म्हणून कशाला हिणवता? तुमच्या राजकारणासाठी विद्यार्थ्यांच्या मनोबलावर आघात करू नका,”
माजी मंत्री विनोद तावडे आणि आशीष शेलार यांनी उदय सामंत यांच्यावर टीका करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. याबाबत मंत्री सामंत यांना विचारले असता, ते म्हणाले, “संकटाच्या काळात विद्यार्थ्यांना धीर देण्याऐवजी विरोधक त्यांच्या मनोधैर्यावर आघात करीत आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता आत्ता परीक्षा घेणे अशक्य आहे; मात्र ज्यांना परीक्षा द्यायचा आहेत, त्यांच्या परीक्षा कोरोना संकटानंतर घेतल्या जाणार आहेत. पण आता विद्यार्थ्यांना ‘कोविड १९ पदवीधर’ म्हणून कशाला हिणवता? तुमच्या राजकारणासाठी विद्यार्थ्यांचा वापर करू नका.”