गोंदिया : विदर्भात उघडकीस आलेल्या शिक्षक भरती घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत करण्याची मागणी केली आहे. शासनाच्या निकटवर्तीय लोकांना शाळा, कॉलेज यांसारख्या संस्था देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
तिरोडा येथे रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना आ. पटोले म्हणाले, “या शिक्षक भरती घोटाळ्यात केवळ प्रशासनच नव्हे, तर सत्ताधारी देखील तितकेच दोषी आहेत. त्यामुळे याची फक्त एसआयटीमार्फत नव्हे, तर थेट उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत चौकशी व्हावी, ही आमची ठाम मागणी आहे.”
याच वेळी ते म्हणाले की, “पुढील काळात या सरकारचे असे अनेक भ्रष्टाचार उघडकीस येणार आहेत.”
शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर बोलताना पटोले म्हणाले की, “सरकारच्या घोषणा आणि पापांमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी २० हजार रुपये हेक्टरी बोनस जाहीर करण्यात आला असला तरी, सरकार स्थापन होऊन चार महिने उलटले, तरीही शेतकऱ्यांच्या खात्यात अजून काहीच जमा झालं नाही.”
“ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे आणि याविरोधात आम्ही तीव्र आंदोलन छेडणार आहोत,” असा इशाराही त्यांनी दिला.