राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आणीबाणीच्या कारावास भोगलेल्यांसाठी आर्थिक मदत म्हणून ‘सन्मान योजना’ सुरु केली होती. सन्मान योजनेअंतर्गत आणीबाणीच्या काळात ज्यांनी १ महिन्याचा तुरुंगवास भोगला त्यांना दरमहा १० हजार रुपयांची पेन्शन देण्यात येते तर ज्यांनी एक महिन्यांपेक्षा कमी तुरुंगवास भोगला त्यांना दरमहा ५ हजार रुपये देण्यात येतात. दरम्यान, भाजपा सरकारने सुरू केलेली ‘सन्मान योजना’ बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादण्याच्या निर्णयाविरोधात भाजपसह त्यावेळीच्या अनेक नेत्यांनी सहभाग घेत आंदोलन केले होते , आणीबाणी ही लोकशाहीची हत्या होती असा आरोप करत भाजप अजुनही काँग्रेसला टार्गेट करत असते. त्यामुळे काँग्रेसचा या योजनेला विरोध होता. त्यामुळेच सरकारने हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.
या आधीही ठाकरे सरकारने फडणवीसांच्या काळात घेतलेले अनेक निर्णय फिरवले होते. सत्तेत आल्यानंतर काही दिवसांनीच काँग्रेसच्या मंत्र्यांनी या योजनेला विरोध केला होता. त्यामुळे या योजनेचं भवितव्य अधांतरीच होते. आज अखेर हि योजना बंद केल्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.