देशात कोरोनानं शिरकाव केल्यानंतर विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला. करोना व लॉकडाउनमुळे अनेक नवे आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली या मुलाखतीत “हे जे संकट आपल्याला दिसतंय, देशातले आणि महाराष्ट्रातील ते संकट दूर करण्यासाठी समन्वयाची कमतरता कुठे दिसतेय का? आणि देशाला एका मनमोहन सिंग यांची गरज आहे का?”, असे प्रश्न राऊत यांनी विचारले.
या प्रश्नाचं उत्तर देताना शरद पवार म्हणाले, “शंभर टक्के गरज आहे. कारण मनमोहन सिंग जेव्हा पहिल्यांदा केंद्रीय अर्थमंत्री झाले. तेव्हा त्या मंत्रिमंडळात मी होतो. मला माहिती आहे, त्यावेळी आर्थिक अडचणीतून आम्ही कसे जात होतो. पण मनमोहन सिंगांनी एक नवीन दिशा दिली. त्याला दोन कारण आहेत. मनमोहन सिंगांनंतर मी नरसिंहरावांना श्रेय देतो. कारण या दोघांनी नेहमीच्या चौकटीतला रस्ता बदलून वेगळ्या वळणावर गाडी नेली आणि संपूर्ण अर्थव्यवस्था सावरली. आज त्याची आवश्यकता होती. तशा प्रकारच्या लोकांची मदत घेऊन पंतप्रधान मोदी यांनी तशा दृष्टीनं पावलं टाकण्याची काळजी घ्यावी आणि त्या गोष्टींसाठी माझी खात्री आहे की, देश सहकार्य करेल,” असा सल्ला शरद पवार यांनी मोदी सरकारला दिला.