धारावीत करोना प्रसारावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्यानंतर आता श्रेयवादावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी धारावीत जीव धोक्यात घालून काम केल्यामुळे करोना नियंत्रणात आल्याचा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. हा दावा खोदून काढत राजू शेट्टी यांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
जर संघाने धारावी कोरोनामुक्त केली असा दावा केला जात असेल, तर संघाचं मुख्यालय असलेल्या नागपुरात कोरोनाचा कहर कसा? तिथला कोरोना अटोक्यात का नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी विचारला आहे.
राजू शेट्टी म्हणाले, “धारावीत कोरोनाचा हाहाकार माजला होता, कोरोनामुळे किड्या मुंग्याप्रमाणे माणसं मरत होती, त्यावेळी आरएसएसचे कार्यकर्ते मदत आणि बचाव कार्यात आघाडीवर आहेत, जीव धोक्यात घालून काम करत आहेत, असं एकही वृत्त वाचनात, पाहण्यात आलं नाही. मात्र WHO ने जेव्हा सांगितलं धारावीची परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली, त्यावेळी अनेक जण श्रेय घेण्यासाठी पुढे आले.
माझ्या मनात एक छोटीशी शंका आहे, RSS चं हेडक्वार्टर असलेल्या नागपुरातही कोरोनाचा हाहाकार आहे, तिथे संघाचे कार्यकर्ते आहेत की नाही हे मला माहिती नाही, कारण मी तरी कोल्हापूरच्या बाहेर गेलेलो नाही. अशी खोचक टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.