मुंबई : सध्या राज्यात सत्तेत असणारं महाविकास आघाडी सरकार हे परिस्थितीमुळे निर्माण झालेलं सरकार असल्याचं मत अ. भा. काँग्रेस समितीचे सचिव आणि राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. महाविकास आघाडीत सर्व १६२ लोकप्रितिनिधींनी निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीमधून एकत्र येण्याचा पर्याय स्वीकारल्याने एकादा पक्ष नाराज असल्याच्या चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होऊ शकतात, असंही त्यांनी म्हटलं आहे.
ते म्हणाले, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीसंदर्भात काही सांगण्याची गरज नाही, मागील अनेक वर्षांपासून आपण पक्षाचं काम पाहत आलेलो आहोत असं म्हणलं. तसेच सध्या आम्ही राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्ष म्हणून आम्ही भूमिका बजावतोय. तर महाराष्ट्रात आम्ही महाविकास आघाडीत सत्तेत आहोत. देशात आम्ही विरोधी पक्षात तर राज्यात सत्ताधारी पक्षात आहोत. सध्या आमची हीच भूमिका आहे असं अमित यांनी स्पष्ट केलं.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपलं आहे ही भावना दाखवण्यात काँग्रेस नेते कमी पडतात का?, या प्रश्नाचंही अमित यांनी उत्तर दिलं. मला क्षणभरासाठीही वाटत नाही की हे सरकार आपलं नाही. आम्ही किमान समान कार्यक्रमाचा स्वीकार करुन सरकारमध्ये सहभागी झालो आहोत. निवडणुकानंतर जी राजकीय परिस्थिती निर्माण झाली त्यातून महाविकास आघाडीचा जन्म झाला, असं अमित यांनी सांगितलं. आम्ही सरकारमध्ये आहोत आणि किमान समान कार्यक्रमाअंतर्गत काम करत आहे. आव्हान पेलत, समतोल राखत सरकार जनतेच्या सेवेसाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करतोय असंही अमित म्हणाले.