रांची : बिहार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार तेजस्वी यादव यांचे आव्हान मोडत पुन्हा मुख्यमंत्री झाले. मात्र, राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महागठबंधन यांच्या जागांमध्ये कमी अंतर आहे. विधानसभेत दोन्ही आघाडीमध्ये फार अंतर नसल्याने विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच नितीशकुमार सरकार अस्थिर असल्याचा दावा करण्यास सुरुवात केली आहे.
त्यातच आता बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर नितीश सरकार पडेल असा दावा बिहारचे माजी मंत्री सुरेंद्र यादव यांनी केला आहे. राष्ट्रीय जनता दलचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी नितीश सरकार पडण्याचा मुहुर्त सांगितला आहे.
सुरेंद्र यादव यांनी रांचीमधील रिम्स रुग्णालयात लालू प्रसाद यांची भेट घेतली. यावेळी माजी आमदार नवाज अहमद आणि राजदचे नेते मोहम्मद फसल देखील उपस्थित होते. या नेत्यांनी लालूंच्या तब्येतीची विचारपूस केली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना सुरेंद्र यादव यांनी, बिहारमध्ये दगाबाजीमुळे महागठबंधनचा पराभव झाल्याचा दावा केला. नितीश कुमार सरकार पाडण्याची कोणतीही घाई आम्हाला नसून हे सरकार बंगाल निवडणुकीनंतर पडेल असे त्यांनी यावेळी सांगितले. नितीश सरकार स्वत:च्या कर्मानेच पडेल, हे सांगण्यासही ते यावेळी विसरले नाहीत.
मोदी सरकारवर टीका
राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्यांनी यावेळी केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकार शेतकऱ्यांना मजूर बनवण्याचा प्रयत्न करत आहे. कॉर्पोरेट फार्मिंगमुळे शेतकरी कंगाल होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. केंद्र सरकारच्या तीन्ही कृषी सुधारणा विधेयकाला पक्षाचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपचे आमदार ललन पासवान यांनी लालू प्रसाद यादव यांच्यावर केलेले आरोप चुकीचे असल्याचा दावा सुरेंद्र यादव यांनी केला. लालूंकडे कोणताही फोन नाही. त्यांच्या भोवती सुरक्षा व्यवस्था असताना कोणताही मोबाईल फोन त्यांच्यापर्यंत पोहचू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.
यापूर्वी भाजप आमदार ललन पासवान आणि लालू प्रसाद यादव यांच्यामधील कथित फोन संभाषण व्हायरल झाले होते. यामध्ये लालू यांनी पासवान यांना मंत्रिपदाचे प्रलोभन दिले होते. पासवान यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे
Read Also :
महाराष्ट्रात सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरु; राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचा गौप्यस्फोट
नो मराठी, नो अॅमेझॉन; मनसेची नवी मोहिम
शरद पवारांनी घेतली संजय राऊतांची भेट, अजित पवार, धनंजय मुंडेही उपस्थित