राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काँग्रेस नेते आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतल्याने अशोक गहलोत सरकार अडचणीत आलं आहे. सचिन पायलट यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. याचदरम्यान पायलट भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सचिन पायलट तिसरी आघाडी बनवू शकतात असंही सांगितलं जात आहे
राजस्थानमधील या राजकीय घडामोडींवर सामनाचे मुख्य संपादक आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आपले मत व्यक्त केले आहे. संजय राऊत म्हणाले,”राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील वाद वैयक्तिक आहेत. त्यामुळे ते मिटतील, सरकारला कोणताही धोका पोहोचणार नाही.” असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.
तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सचिन पायलट भाजपमध्ये आले की नाही हे एक-दोन दिवसातच स्पष्ट होईल. असे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले,”, “त्या पक्षातील आमदारांना किंवा नेत्यांना आपला पक्ष कमकुवत वाटत असेल. त्यांच्या भविष्याबद्दल विश्वास द्यायला त्यांचा पक्ष कमी पडला असेल. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असेल. सचिन पायलट भाजपमध्ये आले की नाही हे एक-दोन दिवसातच स्पष्ट होईल.”