जालना : राज्यात करोना बाधित रुग्णांचा उद्रेक होत आहे. सलग तीन दिवस राज्यातील करोना बाधितांची रुग्णसंख्या ५० ते ५५ हजारांवर जात आहे. परिणामी आरोग्य सोयी-सुविधांचा गोंधळ उडालेला असून इंजेक्शन, बेड, रुग्णवाहिका, ऑक्सिजन, करोना लस अशा आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीत, राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांचे जवळजवळ एकमत झाले असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर, जालन्यात पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी, सर्वांची सहमती मिळाली तर राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन केला जाईल, अशी माहिती दिली आहे. काल मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी आणि घटकांशी चर्चा केली असून लॉकडाऊनमध्ये टास्क फोर्सची भूमिका महत्त्वाची असते, असे त्यांनी सांगितले.
तसेच टोपे यांनी आज किंवा उद्या लगेच लॉकडाऊन लागणार, असे होणार नसून, संपूर्ण नियोजन झाल्यानंतरच लॉकडाऊनची घोषणा केली जाईल असंही सांगितलं.
त्यामुळे आज सुरु असलेल्या टास्क फोर्स बरोबरच्या बैठकीत राज्यात लॉकडाऊन किती दिवसांचा होणार आहे, यावर शिक्कामोर्तब केले जाण्याची शक्यता आहे.